
रायगड-अलिबाग,दि.२१ (जिमाका): मैत्रीबोध परिवाराच्या वतीने शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रम येथे आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. मानवाच्या सर्वांगीण कल्याणासाठी आणि आंतरिक परिवर्तनासाठी कार्यरत असलेल्या मैत्रीबोध परिवाराच्या वतीने आयोजित या विशेष कार्यक्रमात नागरिकांनी आरोग्याचा आणि सौहार्दाचा संदेश देत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे भारताचे केंद्रीय मंत्री (संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय) श्री. गजेंद्र सिंह शेखावत, आमदार महेंद्र थोरवे यांची लाभलेली प्रमुख उपस्थिती.
योग ही आपल्या समृद्ध संस्कृतचा आणि परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. योगाचा दैनंदिन जीवनात अंगीकार करून आपण केवळ आपले शारीरिक स्वास्थ्य उत्तम राखत नाही, तर याद्वारे आपण आपली संस्कृती अधिक बळकट करत आहोत आणि आपल्याला अपेक्षित असलेल्या समर्थ व प्रगत भारताच्या निर्मितीच्या दिशेने वेगाने पाऊल टाकत आहोत, असा मोलाचा संदेश या निमित्ताने देण्यात आला.

केंद्रीय मंत्री श्री. गजेंद्र सिंह शेखावत जी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना योगाचे महत्त्व विशद केले आणि मैत्रीबोध परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
या सोहळ्याप्रसंगी मैत्रीबोध परिवाराचे संस्थापक आणि मार्गदर्शक मैत्रेय दादाश्रीजी यांच्या दिव्य विचारांचे आणि दूरदृष्टीचे स्मरण करण्यात आले. भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ पदावर विराजमान करण्यासाठी आणि देशाची प्रगती अधिक वेगाने साधण्यासाठी मैत्रेय दादाश्रीजी यांनी ‘मैत्री’ आणि ‘संस्कृती’ या दोन महत्त्वाच्या मूल्यांचा मिलाफ असलेला एक अनोखा मार्ग देशाला दाखवला आहे. याच आदर्शांवर चालून देश खऱ्या अर्थाने विश्वगुरू बनू शकतो, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.
हा आंतरराष्ट्रीय योग दिन केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आंतरिक शक्तीशी जोडण्यासाठी आणि वैयक्तिक परिवर्तनाचा एक नवा प्रवास सुरू करण्यासाठी प्रेरित करो, अशी सदिच्छा या वेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
आश्रमात पार पडलेल्या या सुंदर सोहळ्याने उपस्थितांना मानसिक शांतता, कौटुंबिक सुसंवाद आणि शारीरिक आरोग्याची एक नवी आणि सकारात्मक अनुभूती दिली.
000000
