Pune | Sat, 20 June 2026

No Ad Available

राज्यातील नगरपरिषदा/नगरपंचायतींमधील ३८ रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न

Admin | 5 views
राज्यातील नगरपरिषदा/नगरपंचायतींमधील ३८ रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न

मुंबई, दि. २० (रानिआ) : राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा व १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. नामनिर्देशनपत्रे माघारी घेतल्यानंतर १० जिल्ह्यांतील ७ नगरपरिषदा आणि ७ नगरपंचायतींसाठी एकूण ३८ रिक्त जागांसाठी आज २० जून २०२६ रोजी मतदान घेण्यात आले असून या निवडणुकीत सरासरी ७१.८४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.

आज सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगरपरिषद / नगरपंचायतीकरिता ८१.४९ टक्के, नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगरपरिषद / नगरपंचायतीकरिता ६६.५२ टक्के, बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपंचायत / नगरपरिषदेकरिता ७६.३३ टक्के आणि अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपंचायत / नगरपरिषदेकरिता ७३.३३ टक्के तर अकोट नगरपंचायत / नगरपरिषदेकरिता ६७.३१ टक्के मतदान झाले. या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरासरी ७२.१२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तसेच, आज झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये रायगड जिल्ह्यातील पाली नगरपरिषद / नगरपंचायतीकरिता ८५.३० टक्के, नाशिक जिल्ह्यातील पेठ नगरपरिषद / नगरपंचायतीकरिता ८४ टक्के, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगरपरिषद / नगरपंचायतीकरिता ६४.५४ टक्के, वाशिम जिल्ह्यातील मानोरा नगरपरिषद / नगरपंचायतीकरिता ७७.५७ टक्के आणि नागपूर जिल्ह्यातील हिंगणा नगरपरिषद / नगरपंचायतीकरिता ७६.३१ टक्के मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली नगरपरिषद / नगरपंचायतीकरिता ७५.०१ टक्के, कुरखेडा नगरपरिषद / नगरपंचायतीकरिता ८०.३७ टक्के आणि अहेरी नगरपरिषद / नगरपंचायतीकरिता ६१.५० टक्के मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी नगरपरिषद / नगरपंचायतीमध्ये ७४.८५ टक्के मतदानाची नोंद झाली. या नगरपंचायत व नगरपरिषदांच्या पोटनिवडणुकांमध्ये सरासरी ७१.५५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा व १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त जागांपैकी ८ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तसेच, तीर्थपुरी नगरपंचायतीतील पोटनिवडणुकीसाठी एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नसल्याने उर्वरित ३८ जागांसाठी सार्वत्रिक व पोटनिवडणुका घेण्यात आल्या. यासाठी राज्यभरातील ५१ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली.

सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ११ हजार ८२१ पुरुष आणि १० हजार ८५३ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर पोटनिवडणुकांमध्ये ३ हजार ३२४ पुरुष आणि ३ हजार ४१९ महिला मतदारांनी मतदान केले.

सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली असून कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मतदान संपल्यानंतर सर्व मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे सीलबंद करून सुरक्षा कक्षात जमा करण्यात आली आहे. या निवडणुकांची मतमोजणी उद्या, २१ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

०००


Join WhatsApp