
मुंबई, दि. २४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांची विशेष मुलाखत मंगळवार, 28 एप्रिल 2026 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रसारित होणार आहे.
ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी ‘उमेद’ अभियानांतर्गत विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून महिलांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जात असून, त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. यासोबतच महिलांचा आत्मविश्वास बळकट होत असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे. याचबरोबर ‘लखपती दीदी’ उपक्रम, शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ), सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, एकात्मिक शेती समूह (आयएफसी) तसेच ‘नमो ड्रोन दीदी’ यांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे ग्रामीण महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. तसेच ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन’ या उपक्रमाद्वारे स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे.

या विशेष मुलाखतीत मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी ‘उमेद’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली असून, ग्रामीण महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आर्थिक स्वावलंबन साध्य करावे, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला आहे. या कार्यक्रमाचे निवेदन निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी:
X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR
Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
०००
जयश्री कोल्हे/ स.सं
