Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

विकसित भारतासाठी आत्मनिर्भर बुलढाण्याचा संकल्प करुया !

Admin | 9 views
विकसित भारतासाठी आत्मनिर्भर बुलढाण्याचा संकल्प करुया !

बुलढाणा, दि. 26 (जिमाका) : विकसित भारत 2047 च्या विकासगाथेत बुलढाणा जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जावे आणि प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी ‘आत्मनिर्भर बुलढाणा’ घडवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, विभाग प्रमुख, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील पुढे म्हणाले की, भारत हा परिवर्तन, प्रगती आणि आत्मविश्वासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. आज प्रत्येक भारतीयाने ‘विकसित भारत’चा संकल्प करण्याचा क्षण आहे. आज भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश तर आहेच, पण त्याचबरोबर जगातील प्रमुख अर्थव्यवस्थेपैकी एक राष्ट्र बनला आहे. हे यश कोट्यवधी भारतीयांच्या प्रामाणिक श्रमांचे फळ आहे. महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन मानले जाते आणि या विकासयात्रेत बुलढाणा जिल्हाही आत्मविश्वासाने पुढे जात आहे. शेती, उद्योग, शिक्षण, सहकार, डिजिटल सेवा, महिला सक्षमीकरण आणि युवक विकास या सर्व क्षेत्रांत जिल्हा उल्लेखनीय प्रगती करीत असल्याचे ते म्हणाले.

पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवड काळाची गरज
जिल्हाधिकारी डॉ. पाटील पुढे म्हणाले, यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात 7 लाख 29 हजार हेक्टर व रब्बी हंगामात 3 लाख 79 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरीप हंगामात विविध पिकांचे उल्लेखनीय उत्पादन झाले असून रब्बीमध्ये हरभरा, गहू व मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवड काळाची गरज आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत 22 हजार हेक्टरवर फळबाग लागवड झाली असून चालू वर्षी आणखी अडीच हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 429 कोटी रुपये वितरित
अतिवृष्टी, पूर, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासन खंबीरपणे उभे आहे. 2025-26 मध्ये 6 लाख 16 हजार हेक्टर क्षेत्राच्या नुकसानीसाठी 562 कोटींचा निधी मंजूर करून 6 लाख 40 हजार शेतकऱ्यांना 429 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी पीककर्जाला प्राधान्य देत 702 कोटी रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले आहे.  अॅग्रीस्टॅक अंतर्गत 4 लाख 84 हजार शेतकरी ओळख क्रमांक तयार झाले असून उर्वरित शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. तसेच रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी उपक्रमात आतापर्यंत ८० हजार हेक्टरवरील प्लॉटवर नोंदी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिगाव सिंचन प्रकल्पाला चालना
जिगाव सिंचन प्रकल्पासाठी 2200 हेक्टर जमिनीचे भूसंपादन पूर्ण होऊन 1600 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. 4500 हेक्टर जमिनीचे भूसंपादन अंतिम टप्प्यावर आहे. तसेच बाधित गावांचे पुनर्वसनही वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

लोणार सरोवराचे आयआयटी मुंबईमार्फत संशोधन
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 96 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना दाखले देण्यात आले, 1447 पाणंद रस्ते खुले झाले व 1420 गावांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध झाली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे, रुग्णालये व नगरोत्थानासाठी एकूण 124.50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यासह आदिवासी बांधवांसाठी वनहक्क कायद्यान्वये 517 वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले आहे. लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी आयआयटी मुंबईच्या सहकार्याने संशोधन केले जात आहे. तसेच पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

निर्यातीत बुलढाणा जिल्हा अव्वल
प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत 829 उद्योगांना मंजुरी मिळून 612 उद्योग सुरू झाले आहेत. गेल्या वर्षी जिल्ह्यातून 874 कोटी रुपयांची निर्यात झाली असून अमरावती विभागात जिल्हा प्रथम व राज्यात चौथा क्रमांकावर आला आहे. चालू वर्षात 1500 कोटींचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

नोकरी शोधणारे नाही, तर नोकरी देणारे बना
युवकांना संबोधित करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, आजचा काळ हा तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आला आहे. स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, अॅग्री-स्टार्टअप्स, ई-कॉमर्स आणि सेवा क्षेत्रात अपार संधी उपलब्ध आहेत. यातून आजचा युवक नोकरी शोधणारा नाही, तर नोकरी देणारा बनू शकतो. त्यामुळे या संधीचं सोनं करा, कारण तुमच्या कामातून, कौशल्यातून आणि प्रामाणिक प्रयत्नातूनच जिल्ह्याचा आणि देशाचा विकास शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डिजिटल क्रांतीच्या दिशेने पाऊल
डिजिटल क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकत जिल्हा प्रशासनामार्फत ‘महसूल मित्र- सुलभ व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा’ सुरू करण्यात आली असून सेवा हक्क, सहज प्रणाली, प्रतिसाद प्रणाली अशा विविध सेवा नागरिकांना सुलभपणे उपलब्ध केल्या आहेत. यासह भूसंपादन व पुनर्वसन प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांच्या व्यवस्थापनासाठी प्रशासनाने ‘पुनर्भू- भूसंपादन प्रणाली’ विकसित केली असून याद्वारे संपूर्ण माहिती ऑनलाईन उपलब्ध केली आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.

‘मिशन परिवर्तन’चे कौतुक
बुलढाणा पोलिसांनी ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत गुन्हेगारीत 10 टक्के घट व 80 टक्के गुन्ह्यांची उकल केली आहे. तसेच गुन्हेगारांवर वचक राहावा म्हणून जिल्हा पोलीस दलाकडून भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 या नवीन कायद्यातील विविध कलमांन्वये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाची जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी प्रशंसा केली.

यासोबतच, जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान सारखे विविध उपक्रम अत्यंत प्रभावीपणे राबविले जात आहेत. तसेच आरोग्य विभागामार्फत नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, उपक्रम आणि जनजागृती कार्यक्रम प्रभावी ठरत असल्याचे ते म्हणाले. 2047 पर्यंत, स्वातंत्र्याच्या शताब्दी काळात, भारत एक विकसित राष्ट्र बनेल आणि त्या विकासगाथेत बुलढाणा जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जाईल, असा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

मुख्य ध्वजवंदनानंतर जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी पोलीस दलाची परेड पाहणी करुन मानवंदना दिली. त्यानंतर पथसंचलनात पोलीस, वन, महिला व बालविकास, शिक्षण विभागाच्या 9 शाळेतील 1800 विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायतीचे सादरीकरण केले. यासह अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक जनजागृतीच्या उद्देशाने पोलीस विभागामार्फत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासन, पोलीस, जिल्हा परिषद, जिल्हा सैनिक कल्याण, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, नगरपरिषद बुलढाणा, नैसर्गिक आपत्ती विभागातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, राजेंद्र पोळ, डॉ. जयश्री ठाकरे, अजिंक्य गोडगे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी तंबाखु विरोधी, बालविवाह व भृण हत्या प्रतिबंधक शपथ घेण्यात आली. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचारी व खेळाडूंना जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या हस्ते मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांचा गौरव
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, कार्यक्रम तसेच जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमांच्या प्रसार-प्रसिद्धीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्र. जिल्हा माहिती अधिकारी पवन लक्ष्मण राठोड यांचा प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

जिल्हा प्रशासनाच्या विविध उपक्रमांची प्रसार-प्रसिद्धी करून नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आणि माध्यमांच्या समन्वयाने शासनाच्या धोरणांचा सकारात्मक संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी आमदार संजय गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ सन्मानित
समाजातील विविध घटकांसाठी आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचा प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून वर्ष २०२५-२६ या कालावधीत पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसह समाजातील विविध घटकांसाठी आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात कौतुकास्पद कार्यक्रम व उपक्रम राबविले गेले. तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाच्या मिशन परिवर्तन अंतर्गत बुलढाणा जिल्हा नशामुक्त व्हावा म्हणून नशामुक्तीवर आधारित विशेष कार्य केल्या केल्याबद्दल बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाला सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंह राजपूत यांच्यासह वरिष्ठ पत्रकार नितीन शिरसाट, चंद्रकांत बर्दे, राजेश डिडोळकर, युवराज वाघ, विलास खंडेराव, संतोष लोखंडे, सुनिल मोरे, अजय राजगुरे, मृणाल सावळे, रहमत अली आदी उपस्थित होते.
०००


Join WhatsApp