Pune | Tue, 17 February 2026

No Ad Available

सर्वोत्कृष्ट जनसंपर्कासाठी महापारेषणचा जागतिक पातळीवर गौरव; इटलीमध्ये २८ जानेवारीला होणार पुरस्काराचे वितरण

Admin | 24 views
सर्वोत्कृष्ट जनसंपर्कासाठी महापारेषणचा जागतिक पातळीवर गौरव; इटलीमध्ये २८ जानेवारीला होणार पुरस्काराचे वितरण

मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (महापारेषण) सामाजिक उत्तरदायित्व व प्रभावी जनसंपर्क क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. वर्ल्ड इनोव्हेशन अँड चेंज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या वतीने महापारेषणला ‘पीआरओ पीआर ग्लोब सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कम्युनिकेशन अचिव्हमेंट अवॉर्ड्स-२०२५’ या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

या पुरस्काराचे वितरण २८ जानेवारी २०२६ रोजी रोम (इटली) येथे होणाऱ्या पीआरओ पीआर रोमन फोरम या आंतरराष्ट्रीय परिषदेत होणार आहे. या वर्षी सहा खंडांतील एकूण ७६ आंतरराष्ट्रीय परीक्षकांनी विविध संस्थांच्या संवाद, सामाजिक उत्तरदायित्व व जनसंपर्क प्रकल्पांचे मूल्यांकन केले. त्यामध्ये महापारेषणला ‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कम्युनिकेशन अचिव्हमेंट’ या श्रेणीत जगातील अव्वल तीन संस्थांमध्ये स्थान मिळाले आहे.

या पुरस्कारासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, ही या पुरस्काराची महत्त्वपूर्ण बाब आहे. हा उपक्रम क्रोएशियातील अप्रिओरी वर्ल्ड एजन्सीद्वारे गेल्या १४ वर्षांपासून आयोजित केला जातो. या एजन्सीला पीआरसीए (पब्लिक रिलेशन्स अँड कम्युनिकेशन्स असोसिएशन), आयपीआरए (इंटरनॅशनल पब्लिक रिलेशन्स असोसिएशन), सीआयपीआर (चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक रिलेशन्स) आणि आयसीसीओ (इंटरनॅशनल कम्युनिकेशन्स कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन) या चार प्रमुख जागतिक जनसंपर्क संघटनांचे सहकार्य लाभले आहे.

सामाजिक, पर्यावरणीय आणि संवाद क्षेत्रातील सकारात्मक, पारदर्शक आणि नवोन्मेषी उपक्रमांची जागतिक पातळीवर नोंद घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, हा या पुरस्काराचा हेतू आहे.

महापारेषणच्या या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक क्षेत्रातील संवाद, सामाजिक जबाबदारी आणि प्रभावी जनसंपर्काची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली आहे. हा पुरस्कार कंपनीच्या नवोन्मेषी दृष्टीकोनाचे आणि कार्यसंघाच्या संयुक्त प्रयत्नांचे प्रतीक आहे.

जनसंपर्क विभाग आघाडीवर : डॉ. संजीव कुमार

महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी यशाचे श्रेय जनसंपर्क विभाग व त्यांच्या टीमवर्कला दिले आहे. सृजनशील व नावीन्यपूर्ण काम व मीडियात सातत्याने होणारे नवे बदल समजून जनसंपर्क विभागाने कामांमध्ये वैविध्यता आणून सकारात्मक बदल केले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून जनसंपर्क विभाग नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. भविष्यातही, महापारेषणचा जनसंपर्क विभाग सातत्यपूर्ण कामगिरी करून महापारेषणचे नाव उंचावेल, असा विश्वास त्‍यांनी व्यक्त केला.

000


Join WhatsApp