
मुंबई, दि. १६ : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव – वहुर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दोन ऐवजी तीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात याव्यात. तसेच जल जीवन मिशन योजनेअंतर्गत येणाऱ्या पाणीपुरवठा योजनानांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
जलजीवन मिशन अंतर्गत महाड व माणगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षखाली झाली. रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन – नैनुटीया, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता मोहन सरावदे, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, शिक्षण व वित्त सभापती चंद्रकांत कळंबे, जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद रायगड यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत व नळ पाणीपुरवठा योजना अंतर्गत किती नळ जोडणी बाकी आहे याचा आढावा घेऊन त्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव द्यावा व त्यातून नळ पाणी पुरवठा योजनेची नळ जोडणी पूर्ण करून घ्यावी. रायगड जिल्ह्यामध्ये ज्या मंजूर योजना आहेत त्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या त्रुटी पूर्ण करून सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन योजना पूर्ण कराव्यात, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले. यावेळी दाभोळ व टोळा (बु), दासगाव – वहुर, खैरे व २१ गावे, पोलादपूर व १४ योजना यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
००००
गजानन पाटील/विसंअ
