Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील कर्तव्यपथावरील संचलनात महाराष्ट्राचा डंका

Admin | 8 views
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील कर्तव्यपथावरील संचलनात महाराष्ट्राचा डंका

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने पाठवलेल्या सांस्कृतिक पथकाला आंतरराज्य समूह नृत्य स्पर्धेत तिसरा क्रमांक

मुंबई, दि. ३० : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील ‘कर्तव्यपथावर’ पार पडलेल्या दिमाखदार संचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाने प्रथम क्रमांकाचा सर्वोच्च बहुमान पटकावला. आज दिल्लीत राष्ट्रीय रंगशाळा केंट येथे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ व सहसचिव अमिताभ श्रीवास्तव यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या विषयावर आधारित या चित्ररथाने महाराष्ट्राची सांस्कृतिक समृद्धी आणि आर्थिक स्वावलंबनाचे दर्शन संपूर्ण जगाला घडवले. यंदाच्या चित्ररथातून महाराष्ट्राची अष्टविनायक परंपरा, गणेशोत्सवातील सार्वजनिक सहभाग आणि या उत्सवामुळे मिळणारा लाखो हातांना रोजगार (मूर्तीकाम, सजावट, वाद्ये) यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले होते. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचा गणेशोत्सव कसा पूरक ठरतो, हे या चित्ररथातून प्रकर्षाने मांडण्यात आले.

चित्ररथासोबत पारंपरिक वेशभूषेत लेझीम, नृत्य सादर करणाऱ्या कलाकारांनी कर्तव्यपथावर चैतन्य निर्माण केले. त्यांच्या ऊर्जेमुळेच महाराष्ट्राच्या चित्ररथाला विशेष पसंती मिळाली. शिवाय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सादरीकरण करण्यासाठी पाठवलेल्या पथकाला देखील तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे .

“महाराष्ट्राच्या मातीतील कलेचा आणि कारागिरांच्या कष्टाचा हा सन्मान आहे. गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून तो अनेकांच्या रोजगाराचे आणि आत्मनिर्भरतेचे साधन आहे, हे आपण जगाला दाखवून दिले आहे. हे यश महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे आणि कलात्मक शिस्तीचे राष्ट्रीय पातळीवर झालेले ठळक दर्शन आहे, असे गौरोद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.

गौरवास्पद कामगिरीमागे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे, यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व मोलाचे ठरले. चित्ररथ समूहातील अधिकारी, कलाकार आणि सर्व सहकाऱ्यांची मेहनत, समर्पण आणि संघभावना यामुळे हे यश शक्य झाले.

कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा गौरवपूर्ण यशाने महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख अधिक उंचावली आहे. या चित्ररथाचे गीतलेखन बिभिषण चवरे यांचे असून गाण्याचे गीतकार मयुरेश सुकाळे व सिद्धेश जाधव आहे. संगीत संयोजन मनोहर गोलांबरे यांनी केले आहे.

कोल्हापूर, सातारा, सांगली ग्रामीण भागातून आलेल्या विविध कलाकारांनी तसेच चंद्रकांत पाटील व राजेंद्र संकपाळ यांच्या पथकाने सांघिक भावनेने ऐकतेचे प्रदर्शन करून उत्तमरित्या लेझीम नृत्याचे सादरीकरण केले. या चित्ररथाचे कलादिग्दर्शन व बांधणी नागपूर येथील तुषार प्रधान, रोशन इंगोले, कृष्णा सालटकर व श्रीपाद धोंगडे यांनी केले आहे.

००००

संजय ओरके/विसंअ


Join WhatsApp