
मुंबई, दि. 1 : – देशातील नाविन्यपूर्ण संशोधन, विकास आणि औषधनिर्मिती क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ मध्ये ‘बायोफार्मा शक्ती’ या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी पुढील पाच वर्षांसाठी १०,००० कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली असून, यामुळे देशाच्या बायोफार्मास्युटिकल क्षेत्रात व्यापक परिवर्तन घडून येणार आहे. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आभार मानले आहेत.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे ‘लाईफ सायन्सेस इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर’ स्थापनेसाठी केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करत केंद्र सरकारने या महत्त्वपूर्ण निर्णयाला मान्यता दिली आहे.
या निधीच्या माध्यमातून बायोफार्मा क्षेत्रातील जागतिक दर्जाची इनोव्हेशन पार्क्स उभारली जाणार असून, देशांतर्गत औषधनिर्मिती, निर्यातवाढ, संशोधनाला चालना तसेच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे.
“महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे फार्मास्युटिकल आणि लॉजिस्टिक्स हब बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांना केंद्र सरकारने ठाम पाठबळ दिले आहे. ‘बायोफार्मा शक्ती’ हा उपक्रम औषधनिर्मिती आणि जीवनविज्ञान क्षेत्रातील प्रगतीसाठी एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल,” असा विश्वास मंत्री नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केला.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांचे विशेष अभिनंदन करून मनःपूर्वक आभार मानले आहेत.
