
नागपूर, दि.28 : विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या नेतृत्वात नागपूर विभागीय कार्यालयाने राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांपेक्षा 7 निकषांवर सरस कामगिरी करत 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम मूल्यमापनात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड प्रजासत्ताक दिनी एक्स समाज माध्यमाद्वारे जाहीर केली.
150दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवड जाहीर करताना अतिशय आनंद होत असल्याच्या भावना व्यक्त करत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या सर्व कार्यालयांचे प्रमुख आणि त्यांच्या चमूचे हार्दिक अभिनंदनही केले आहे.
सर्वंकष 7 मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी
कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, ए आय व ब्लॉकचेनचा शासकीय कामकाजात वापर आणि जीआयएस चा कामात वापर अशा एकूण 7 सर्वंकष मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड करण्यात आली.
ही कार्यालये ठरली राज्यात अव्वल
ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालयांमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयांच्या गटात नागपूर विभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयांच्या गटात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय,पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालयांच्या गटात ठाणे पोलीस अधीक्षक कार्यालय, महानगरपालिकांच्या गटात पनवेल मनपा, पोलीस आयुक्त कार्यालयांच्या गटात नाशिक पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक कार्यालयाच्या गटात नांदेड, राज्यस्तरीय आयुक्तालय/संचालनालयाच्या गटात संचालक, तंत्र शिक्षण कार्यालय,राज्यस्तरीय मंडळे, महामंडळे, प्राधिकरण गटात महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मंत्रालयीन विभाग गटात सार्वजनिक बांधकाम विभाग प्रथम आले आहे.
सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व विजेत्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येईल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे येत्या 8 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहेत.
०००००
