Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

अमरावती जिल्ह्याच्या शेती, शिक्षण, औद्योगिक विकासावर भर देणार – मंत्री दादाजी भुसे

Admin | 6 views
अमरावती जिल्ह्याच्या शेती, शिक्षण, औद्योगिक विकासावर भर देणार – मंत्री दादाजी भुसे

अमरावती, दि. 26 (जिमाका) : जिल्ह्याला जागतिक नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी शेती, शिक्षण उद्योग आणि महिला सक्षमीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहे. यात प्रामुख्याने सिट्रस इस्टेटमधील एआय प्रकल्प आणि आशियातील सर्वात मोठे पायलट ट्रेनिंग सेंटर जिल्ह्याच्या प्रगतीला नवी दिशा देतील. शासन शेतकरी, महिला, युवा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवित असून प्रगत तंत्रज्ञानाने जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानावर पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या कृषी, शिक्षण, औद्योगिक, शैक्षणिक आणि पर्यटन क्षेत्रातील प्रगतीचा आलेख मांडला. यावेळी पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले जनार्दन बोथे गुरुजी, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, पोलिस आयुक्त राकेश ओला, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद तसेच इतर विभागातील अधिकारी आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले, शेतकरी हा देशाचा कणा असून गेल्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत केली आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. प्रामुख्याने संत्रा पिकासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आधारित तंत्रज्ञानाचा प्रकल्प राबविला जात आहे. औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी ‘पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क’ची स्थापना करण्यात आली असून अमरावती विमानतळावरील आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे.

चिखलदरा येथील ‘स्कायवॉक’मुळे पर्यटनात वाढ होणार आहे. तसेच मेळघाटातील नाईट सफारी आणि ‘मधाचे गाव’ ही संकल्पना स्थानिक आदिवासींचे जीवनमान उंचावेल. तसेच सिंधी समाजाच्या नागरिकांना जमिनीचा मालकी हक्क दिला आहे. ‘लाडकी बहीण’ लाभार्थींनी पतसंस्था स्थापन करण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे.

प्रजासत्ताक दिनी राज्यभरातील 1 लाख शाळांमधील 2 कोटी विद्यार्थ्यांनी ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायती सादर केल्या. ज्यामध्ये जिल्ह्यातील 1 हजार 500 विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन आकर्षक कवायती सादर केल्या. विद्यार्थ्यांमध्ये प्रखर राष्ट्रभक्ती, स्वयंशिस्त आणि शारीरिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्र्यांनी मैदानावर येऊन दाद दिली. यावेळी त्यांच्यासह सर्वांनी टाळ्यांचा कडकडाटात विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. त्यांनी मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, माजी विद्यार्थी संघ स्थापना, विविध समित्यांचे एकत्रीकरण, कॉपीमुक्त अभियान आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर राबवल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची घोषणा करीत शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा मानस व्यक्त केला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम गुरुकुंजचे सचिव जनार्दन बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाबद्दल श्री. भुसे यांनी श्री. बोथे गुरुजी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. समाजसेवेसाठी श्री. बोथे गुरुजी यांना जाहीर झालेला पद्‌मश्री पुरस्कार हा सर्व अमरावतीकरांसाठी अभिमान आणि गौरवाचा क्षण असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर विविध पथकांनी परेड संचलन केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा ‘बालविवाहमुक्त’ करण्याबाबत शपथ देण्यात आली.


विभागीय आयुक्तालयात मानवंदना
विभागीय आयुक्तालयात विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या हस्ते ध्वजवंदन करून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी विभागीय आयुक्तांनी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर पोलीस पथकाव्दारे तिरंग्यास मानवंदना देण्यात आली.
यावेळी अपर आयुक्त सुरज वाघमारे, संजय जाधव, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, सुशील आग्रेकर, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे, नायब तहसीलदार मधुकर धुळे, संदीप टांक, श्यामसुंदर देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी पोलीस वाद्यवृंद पथकाने राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी दिली. ध्वजवंदनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते जिल्हा शोध व बचाव पथकात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यात अमरावती (ग्रामीण) पोलीसातील दीपक पाल, दीपक डोरस, सचिन धरमकर, सुमित बांबल आणि गजानन वाडेकर, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ९ मधील विशाल निमकर, भूषण वैद्य, देवानंद भुजाडे, आकाश निमकर, अर्जुन सुदंल्डे आणि गणेश जाधव, मनपा अग्निशामक विभागातील सुशांत तायडे, सुरेश पालवे, जिल्हा होमगार्डमधील अजय आसोले, प्रफुल्ल भुसारी, महेश मांदाळे, सूरज ठाकूर, सागर माहुलकर आणि दीपक चिल्लोरकर यांचा समावेश आहे.

यावेळी उपस्थितांना कृष्ठरोग निर्मूलनाची शपथ देण्यात आली. ध्वजवंदन कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, दुर्गा देवरे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा सूचना अधिकारी मनीषकुमार, तहसीलदार निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा आदी उपस्थित होते.

राज्य माहिती आयोगाच्या कार्यालयात ध्वजवंदन
राज्य माहिती आयोग, खंडपीठ अमरावती कार्यालयात राज्य माहिती आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करुन मानवंदना देण्यात आली. यावेळी आयोगातील उप सचिव देविसिंग डाबेराव, कार्य अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
०००


Join WhatsApp