Pune | Sun, 15 February 2026

No Ad Available

१४० किलोमीटर समुद्र किनाऱ्याच्या सरंक्षणाची जबाबदारी रत्नागिरीकरांची  – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

Admin | 1 views
१४० किलोमीटर समुद्र किनाऱ्याच्या सरंक्षणाची जबाबदारी रत्नागिरीकरांची  – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. १४ (जिमाका) : देशाच्या सीमेवर जसे सैनिक काम करतात तसेच देशाच्या अंतर्गत फार मोठी सुरक्षा देण्याचे काम सीआयएसएफच्यामार्फत होते. आपल्या देशातला पूर्ण समुद्र किनारा हा सुरक्षित राहिला पाहिजे. हे प्रत्येकाला कळले पाहिजे. या भावनेतून सीआयएसएफ चे 130 सायकल चालवणारे अधिकारी वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉनच्या माध्यमातून त्याबाबतची जनजागृती करत आहेत. 140 किलोमीटर समुद्र किनाऱ्याच्या सरंक्षणाची जबाबदारी रत्नागिरीकर म्हणून आपण घेऊ या, असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी कार्यरत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) आपल्या गौरवशाली सेवेचे औचित्य साधत आज येथील पोलीस मैदानावर ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–2026’ अंतर्गत 130 सायकलपटू आज रत्नागिरीत दाखल झाले. या सायकलपटूंचे या उपक्रमाचे दिमाखदार स्वागत करण्यात आले. तसेच, उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते झेंडा दाखवून पुढील मार्गक्रमणासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पोलीस बँड पथकांने या सायकलपटूंना यावेळी मानवंदना दिली. तसेच सुरक्षित तटम् समृद्ध भारत हे घोषवाक्य लिहीलेले टि-शर्ट यावेळी वितरीत करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, सीआयएसएफचे वरिष्ठ कमांडंट भास्कर कुमार, वरिष्ठ कमांडंट राहूल कुमार, कोस्टगार्ड कमांडंट (जे.जी.) कृष्ण कुमार, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

या सायक्लोथॉनचा उद्देश किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृती, राष्ट्रीय एकात्मता, तंदुरुस्ती, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हा आहे. विशेष बाब म्हणजे या मोहिमेत 65 महिला सहभागी झाल्या आहेत. या सायक्लोथॉनद्वारे किनारी भागातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे भान निर्माण करणे, नागरिक व ‘सीआयएसएफ’ यांच्यात समन्वय वाढवणे, तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या धोक्यांबाबत जागरूक करणे आणि बंदर सुरक्षेतील ‘सीआयएसएफ’च्या अनुभवाची माहिती देणे हा उद्देश आहे.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, आपला समुद्रकिनारा सुरक्षित ठेवण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत काढलेल्या सायकल रॅलीला मनापासून शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सीआयएसएफचे नक्की काय काम असतं, हे आपण विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आम्ही देखील सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. विमानतळाची पूर्ण सुरक्षा या सगळ्या यंत्रणेवर असते.

आलेल्या 130 सायकलिस्ट पैकी 65 या महिला भगिनी आहेत. त्यांनी चौदाशे किलोमीटरचा टप्पा गाठलेला आहे. देशातील संरक्षण करण्याची भावना जर मनामध्ये असेल तर महिला भगिनी देखील काय करू शकतात हे देशाला सीआयएसएफच्या टीमने दाखवून दिलं त्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे मनःपूर्वक त्यांचं कौतुक करतो, असेही ते म्हणाले.

शहीद जवानांच्या कुटुंबाचा सन्मान

शहीद धोंडूराम जाधव, त्यांच्या पत्नी सुनंदाबाई धोंडूराम जाधव, शहीद केशव मोरे त्यांची पत्नी सुनंदा मोरे तसेच विनायक कृष्णाजी म्हस्के यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

रोमांच उभे करणारे देशभक्तीगीत

दामले हायस्कूलच्या विद्यार्थीनीनी उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे करणारे देशभक्तीपर गीत आपल्या अदाकारीतून सादर केले. नवनिर्माण महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेटनी एनसीसी गीत म्हतले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत वरिष्ठ कमांडंट भास्कर कुमार यांनी या रॅलीचा संपूर्ण उद्देश सांगितला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्ज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेस्त्री हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक इम्तीयाज सिद्दीकी यांनी केले. कार्यक्रमाला प्रातांधिकारी जीवन देसाई, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, तहसिलदार राजाराम म्हात्रे, बिपीन बंदरकर यांच्यासह रत्नागिरी सायकल क्लब, एनसीसीचे विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००


Join WhatsApp