
मुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवार 3 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8.00 वाजता “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत “हिंद-दी-चादर” शहीदी समागम समितीचे सदस्य तथा उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांनी या कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 19 फेब्रुवारी 2026 रोजी नवी मुंबई येथे भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून त्यादृष्टीने सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले केले. या शहीदी समागम वर्षाच्या पार्श्वभूमीवर श्रमदान उपक्रमांच्या माध्यमातून सेवाभाव, सामाजिक सलोखा व स्वच्छतेचा संदेश दिला जाणार असून, युवा पिढीपर्यंत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे विचार, त्याग आणि मानवतावादी मूल्ये पोहोचवण्यासाठी शासनामार्फत विविध जनजागृती, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही उपजिल्हाधिकारी श्री. पवार यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.
या विशेष मुलाखतीत उपजिल्हाधिकारी पवार यांनी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी राष्ट्र, धर्मस्वातंत्र्य आणि सांस्कृतिक मूल्यांच्या रक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांच्या त्यागातून मानवतावाद, सहिष्णुता आणि सामाजिक ऐक्याचा जो संदेश मिळतो, तो आजच्या काळात अधिकच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी आपल्या मुलाखतीतून सांगितले.
ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही प्रसारित करण्यात येणार असून, निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.
X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR
Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
0000
जयश्री कोल्हे/स.सं
