
सोलापूर, दि. १८ (जिमाका): यशस्वी जीवनासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने योग व मेडिटेशनचा अंगीकार करावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. दयानंद शिक्षण संस्था, वेलणकर हॉल, सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे प्रशासक डॉ. व्ही.पी. उबाळे होते. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. महेश चोप्रा, शिक्षणशास्त्र विभागाचे प्राचार्य डॉ. एस.बी. क्षीरसागर, वाणिज्य शाखेचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी तडवळकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ. उबाळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेमार्फत विविध अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. गुणवत्तेचा पाया भक्कम करण्यासाठी योग, कराटे, लाठी प्रशिक्षणासह मानसिक आरोग्यविषयक उपक्रमांची गरज आहे.
मंत्री पाटील यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, दयानंद शिक्षण संस्था ही सन १९४० पासून कार्यरत असलेली देशातील एक प्रगत संस्था आहे. सध्या संस्थेत सुमारे ८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी योग, लाठी, कराटे यांसारख्या प्रशिक्षणांचा समावेश करणे अत्यावश्यक आहे.
रेवा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य क्षिरसागर यांनी आभार मानले.
०००
