
मुंबई, दि. 27 :- राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत शिक्षणतज्ज्ञ डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे. ही समिती मुंबई जिल्हा भेटीसाठी 28 नोव्हेंबर 2025 रोजी येत असून त्याकरिता प्रश्नावली व मतावली तयार करण्यात आलेली आहे. सदर प्रश्नावली व मतावली http://tribhashasamiti.mahait.org या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांनी कळविले आहे.
या भेटीदरम्यान समिती सामान्य नागरिक, भाषातज्ज्ञ, विचारवंत, मराठी भाषेशी संबंधित किंवा संलग्न शासकीय किंवा अशासकीय/ खासगी संस्था यांचे अध्यक्ष/ सदस्य, राजकीय पक्षांचे नेते/ लोकप्रतिनिधी, प्राथमिक/ माध्यमिक, शिक्षक संघटना यांचे अध्यक्ष सदस्य, पालक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, आंदोलनकर्ते इत्यादी बरोबर संवाद साधणार असून त्रिभाषा धोरणासंदर्भात त्यांची मते व विचार जाणून घेणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र कोणत्या इयत्तेपासून, कशाप्रकारे लागू करावयाचे याबाबतचे धोरण निश्चित करण्याकरिता समिती राज्यातील विविध विभाग/ जिल्हा स्तरावर भेटी देत आहे. 28 नोव्हेंबर 2025 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे मुंबई जिल्ह्याकरीता चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. या चर्चासत्राकरिता सकाळी 10 वाजता अभ्यागतांची नोंदणी सुरू होईल व प्रत्यक्ष संवाद सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. तसेच ही समिती त्याच दिवशी दुपारी 3 ते 5 वाजता ऑनलाईन व्ही.सी. द्वारे ठाणे/ रायगड/ पालघर या जिल्ह्याकरीता संवाद साधणार आहे.
००००
बी.सी.झंवर/विसंअ
