
नागपूर दि.१२ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक सभ्य, सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशी शोकसंवेदना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोक संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, शिवराज पाटील चाकूरकर यांनी लोकसेवेचा नवा आदर्श निर्माण केला होता. साधेपणा आणि नैतिक मूल्यांचे ते प्रतीक होते. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंजाबचे राज्यपाल अशी विविध पदे भूषवत असताना त्यांनी राजकारणातील नैतिकता कायम जपली. लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करीत असताना लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नवीन ग्रंथालय इमारत यासारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली. त्यांच्या कारकिर्दीतच उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू झाले. भारतीय संविधानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
००००
