
मुंबई, दि.२४: मोजक्या शब्दांत, नेमका संदेश पोहोचविण्यात शब्दांचा किमयागार म्हणता येईल अशा साक्षेपी व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिरात क्षेत्रातील ज्येष्ठ लेखक पियुष पांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘अबकी बार, मोदी सरकार! या चारच शब्दांत दिवंगत पांडे यांनी जगातील एका मोठ्या लोकशाही राष्ट्रातील सार्वत्रिक निवडणुकीत आगळी किमया साधली. अनेक कंपन्यांच्या उत्पादनांना त्यांनी समर्पक अशा ओळींनी ओळख मिळवून दिली. त्यांच्या जाहिरातींनी भारतीय जाहिरात क्षेत्रात बदल आणले. ज्या काळात केवळ मुद्रित माध्यमासाठी जाहिरात बनवली जायची, त्या काळातही त्यांनी दूरचित्रवाणीसारख्या माध्यमासाठी प्रभावी लेखन केले. भारतीय भाषांच्या सौष्ठवाचा पूर्ण वापर आणि एका वाक्यात दिला जाणारा संदेश त्यांच्या जाहिरातींचे वैशिष्ट्य ठरले. पांडे यांच्या निधनामुळे प्रतिभावान लेखक, कला, संस्कृती आणि विविध क्षेत्रांची समज असलेल्या व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत. त्यांच्या निधनामुळे पांडे कुटुंबीयावर दुःखाचा आघात झाला आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी, अशी प्रार्थना करतो आणि ज्येष्ठ लेखक पियुष पांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
000
