
वर्धा, दि. १६ (जिमाका): राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अनेक वर्ष वास्तव्य असलेल्या आश्रमास भेट दिली. या भेटीत त्यांनी प्रार्थना सभेत सहभाग घेतला तसेच परिसरात वृक्षारोपण केले.

यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित होते. आश्रमात आगमन झाल्यानंतर आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने सचिव विजय तांबे व विश्वस्त चंदनपाल यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. आश्रमात बापूंचे पहिले निवासस्थान असलेले आणि आता आदि निवास म्हणून ओळखल्या जात असलेल्या आदि निवाससह बापुंचे अनेक वर्ष वास्तव्य असलेल्या बापू कुटीस भेट देऊन पाहणी केली.

सोबतच कस्तुरबा गांधी यांचे वास्तव्य असलेले ‘बा’ निवास व बापूंच्या तत्कालिन कार्यालयास भेट देऊन पाहणी केली. आश्रम प्रतिष्ठानचे सचिव विजय तांबे यांनी बापूंचे निवास व बापूंशी संबंधित अनेक बाबींची माहिती दिली. यावेळी राष्ट्रपतींनी चरख्यावर प्रत्यक्ष सूत कताई केली. आश्रम भेटीनंतर त्यांनी बापूकुटी परिसरात बेलवृक्षाचे रोपण केले.

यावेळी प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी वान्मथी सी, विशेष पोलीस महानिरिक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल तसेच आश्रम प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

तत्पूर्वी राष्ट्रपतींचे सेवाग्राम हेलिपॅड येथे आगमन झाल्यानंतर राज्यपाल वर्मा, मंत्री बावनकुळे, पालकमंत्री डॉ. भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी स्वागत केले.

०००
