
मुंबई, दि. २० : वेगाने बदलणाऱ्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारिता क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान महत्त्वाचे बदल घडवत आहे. या बदलांकडे संधी म्हणून पाहत महिला पत्रकारांनी अधिक तंत्रस्नेही व्हावे. या तंत्रज्ञानाच्या उपयोगाने महिला पत्रकार पत्रकारितेच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकतात, असा विश्वास माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय महिला आयोग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृह येथे आयोजित महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारितेवरील त्याचा परिणाम’ या विषयावर प्रधान सचिव ब्रिजेश सिंह बोलत होते.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, प्रख्यात लेखिका डॉ. रिचा सूद, नवी दिल्ली येथील वरिष्ठ पत्रकार डॉ. स्वाती गुप्ता उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान हे मानवीय संदर्भावर काम करते. त्यामुळे त्यामध्ये चूक असण्याची शक्यता असते. पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करताना संदर्भ बिनचूक असतील याची खात्री करावी. महिला पत्रकार राजकीय, मनोरंजन क्षेत्रासह गुन्हेविषयक क्षेत्राचेही वार्तांकन करीत असतात. वार्तांकन करताना महिला पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अत्यंत उपयोगाचे ठरू शकते.
विश्लेषणात्मक आणि संशोधनात्मक कामांसाठी अधिक वेळ
‘ए आय’ हे केवळ माहितीचे साधन नसून ते पत्रकारितेचा वेग वाढवणारे एक शक्तिशाली माध्यम आहे. माहितीचे संकलन, भाषांतर आणि विविध व्यासपीठांवर मांडणी करण्यासाठी एआयचा प्रभावी वापर करून कामाची गुणवत्ता सुधारता येते. एआयमुळे मानवी श्रमाची बचत होऊन पत्रकारितेतील विश्लेषणात्मक आणि संशोधनात्मक कामांसाठी अधिक वेळ मिळत असल्याचेही प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले.
बदलत्या काळात समृद्ध पत्रकारिता आणि आघाडीवर राहण्यासाठी महिलांनी एआय टूल्सचा वापर करणे काळाची गरज आहे. एआयमुळे उपलब्ध होणाऱ्या नव्या संधींचा फायदा घेण्यासाठी महिला पत्रकारांनी तांत्रिक कौशल्यांत प्रगती करणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात तंत्रज्ञानाशी मैत्री करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी महिलांकडे असल्याचे सांगत ब्रिजेश सिंह यांनी राष्ट्रीय महिला आयोगाने महिला पत्रकारांसाठी एआय मधील कौशल्य प्रशिक्षण सुरू करण्याचे आवाहनही केले.
इंग्रजी भाषेचा अडसर दूर करून प्रादेशिक भाषांमध्ये एआयचा वापर करणे आवश्यक आहे. सर्वम सारख्या ‘इंडिक’ एआय टूल्समुळे ग्रामीण भागातील बातम्या किंवा माहिती थेट संबंधित लोकांपर्यंत स्थानिक भाषेत पोहोचवणे आता सोपे होणार आहे. यामुळे भाषेची मर्यादा संपुष्टात येऊन माहिती सार्वत्रिक होईल आणि त्याचा लाभ स्थानिक स्तरावरील महिला पत्रकारांना होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.कार्यशाळेदरम्यान माहिती व जनसंपर्क विभागात सुरू असलेल्या डिजिटल उपक्रमांची माहिती देत प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले, विभागात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगातून अचूक वृत्तांकन वेगाने वितरण करण्यात येत आहे. ‘एआय’च्या क्षेत्रात काम करताना नैतिक नियमावली महत्वाची आहे. अशी नियमावली युरोपात तयार करण्यात आली आहे. भारतातही अशा पद्धतीची नियमावली आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
0000
