
मुंबई, दि.15 : पाणीपुरवठा योजनेतील कामे अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे आणि प्रत्येक अधिकाऱ्याची तसेच कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
मंत्रालयात वर्धा तालुक्यातील पिपरी (मेघे) व 13 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा संबंधी बैठक झाली.
बैठकीस गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगा नाईक, जलजीवन मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई. रवींद्रन, सहसचिव डॉ. बी. जी. पवार, मुख्य अभियंता प्रशांत भामरे यांच्यासह वर्धा जिल्ह्यातील संबंधित अधिकारी तसेच पिंपरी (मेघे) व अन्य गावांचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पाणीपुरवठा योजना या ग्रामीण भागासाठी महत्त्वाच्या असून प्रत्येक घरापर्यंत शुद्ध, स्वच्छ आणि नियमित पाणी पोहोचवणे हे योजेनेचे उद्दिष्ट आहे. नवीन पाईपलाईन टाकताना स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊनच काम करावे. योजनेतील सर्व घटक वेळेत पूर्ण करून नागरिकांना पाणी मिळेल याची काळजी घ्यावी.
यावेळी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील प्रगतीचा आढावा घेण्यात आला. योजनेत उशीर होण्यामागील कारणे, ठेकेदारांच्या अडचणी, तांत्रिक बाबी तसेच निधीवाटपाविषयी चर्चा झाली. प्रत्येक स्तरावर समन्वय राखून कामकाज गतीमान करावे.ग्रामीण भागातील पाणीपुरवठा हा लोकजीवनाशी निगडित विषय आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने हे काम केवळ प्रशासनिक दृष्ट्या नव्हे, तर जनसेवेच्या भावनेतून पार पाडावे, असेही पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी सांगितले.
०००००००
राजू धोत्रे/विसंअ
