
अमरावती दि. 26 : महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवस कृती आराखडा अंतर्गत ई-गव्हर्नन्स कार्यक्रम तसेच सेवा विषयक बाबींच्या अनुषंगाने दि. 6 मे ते 2 ऑक्टोंबर पर्यंत सर्व विभागीय व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सेवा कर्मी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आपले सरकार पोर्टलवर विविध विभागाकडून पुरविण्यातयेणाऱ्या सेवा अधिसूचित केल्या आहेत. त्या सेवा सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी केले आहे.
या अंतर्गत आपले सरकार पोर्टल अंतर्गत अधिसुचित सेवा सर्व नागरिकांना विहित कालमर्यादेत उपलब्ध करून देणे व तक्रारींचे जलद निवारण करणे हा एक मुख्य घटक आहे. महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणामार्फत दिल्या जाणा-या अधिसुचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहीत कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ पारित करण्यात आला असुन नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे. महसूल विभागा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या उदा. उत्पन्न प्रमाणपत्र, वय व अधिवास प्रमाणपत्र, जात व नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र तसेच विशेष सामाजिक सहाय्य योजनांतर्गत लाभ देणे व इतर सेवा मिळविण्यासाठी नागरिकांनी या पोर्टलचा व अधिसूचित सेवाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.
00000
