Pune | Sat, 14 February 2026

No Ad Available

गुरु तेग बहादुर आणि संत नामदेव : मूलभूत विचारांची समानता

Admin | 2 views
गुरु तेग बहादुर आणि संत नामदेव : मूलभूत विचारांची समानता

भारतीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा ही विविध संत, गुरू आणि विचारवंतांच्या योगदानातून समृद्ध झालेली आहे. या परंपरेत महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे अग्रणी संत नामदेव महाराज (इ.स. १२७०–१३५०) आणि शीख धर्माचे नववे गुरु, श्री गुरु तेग बहादुर साहिब (इ.स. १६२१–१६७५) हे दोन युगपुरुष वेगवेगळ्या काळात जन्मले. या दोघांमध्ये सुमारे तीन शतकांचे कालांतर असले, तरी त्यांच्या जीवनकार्याचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यास मूलभूत विचारधारेत लक्षणीय समानता आढळून येते. ही समानता अधोरेखित करण्याच्या दृष्टीने नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला ‘हिंद-दी-चादर’ हा विशेष उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतो.

हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन राज्यभर करण्यात आले होते. नागपूर आणि नांदेड येथे अल्पसंख्याक विकास विभाग, राज्यस्तरीय समन्वय समिती आणि शीख सिकलीगर, बंजार, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन व भगत नामदेव संप्रदाय समुदायाच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. यावेळी लाखोंच्या संख्येने भाविक राज्य, देशभरातून आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवा पिढीपर्यंत गुरू तेग बहादुर यांचा शौर्याचा इतिहास पोहाचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून भक्ती, सत्य, साधेपणा आणि मानवी समता यांचा पुरस्कार केला. त्यांनी जात, वर्ण आणि कर्मकांडांवर आधारित भेदभावाला ठाम विरोध केला. “ईश्वर सर्वत्र आहे” ही भावना त्यांच्या विचारांचे केंद्रबिंदू होती.  त्याचप्रमाणे श्री गुरु तेग बहादुर साहिब यांनीही ईश्वर एक असून तो सर्व मानवांचा आहे, असा सार्वत्रिक दृष्टिकोन मांडला. त्यांनी धार्मिक असहिष्णुता, अन्याय आणि जबरदस्तीविरुद्ध उभे राहून मानवमूल्यांचे संरक्षण केले.

निर्भयता, सत्यनिष्ठा आणि बलिदान संत नामदेव महाराजांनी सामाजिक अन्यायाविरोधात निर्भयपणे आवाज उठविला. सत्य आणि नामस्मरण हाच खरा धर्म असल्याचे त्यांनी आपल्या रचनांमधून स्पष्ट केले.

श्री गुरु तेग बहादुर साहिब यांनी सत्य, संस्कृतीचे रक्षण आणि मानवी स्वाभिमान यांसाठी सर्वोच्च बलिदान दिले. संत नामदेवांनी माणसाच्या अंतःकरणातील शुद्धता आणि आत्मसन्मान यांना सर्वोच्च स्थान दिले. बाह्य औडंबरापेक्षा अंतर्गत भक्ती व नैतिकता महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गुरु तेग बहादुर साहिब यांनी व्यक्तिस्वातंत्र्य, विशेषतः धार्मिक स्वातंत्र्य, हा मानवी जीवनाचा मूलभूत अधिकार असल्याचा संदेश आपल्या आचरणातून दिला.

‘हिंद-दी-चादर’ उपक्रमाचे महत्त्व

नागपूर, नांदेड येथे श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त आयोजित केलेला ‘हिंद-दी-चादर’ हा विशेष उपक्रम सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्मसमभाव यांचा संदेश देणारा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गुरु तेग बहादुर साहिब यांच्या त्याग, बलिदान व मानवतावादी विचारांचा प्रसार करण्यात आला. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या संत परंपरेतील संत नामदेव महाराजांच्या विचारांशी असलेली वैचारिक समानता अधोरेखित करण्यात आली.

सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता

संत नामदेव महाराज आणि गुरु तेग बहादुर साहिब यांच्या विचारधारेमुळे समाजात सहिष्णुता, बंधुता आणि समतेची भावना दृढ झाली. या दोन्ही महापुरुषांचे विचार आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीतही मार्गदर्शक ठरतात.

‘हिंद-दी-चादर’ या उपक्रमातून विविध धर्म, पंथ आणि समाजघटकांमध्ये परस्पर सन्मान व समन्वयाची भावना वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

संत नामदेव महाराज आणि श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्यात जरी तीन शतकांचे कालांतर असले, तरी सत्य, निर्भयता, मानवी स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि ईश्वरभक्तीची सार्वत्रिक भावना ही दोघांच्या विचारधारेची समान सूत्रे आहेत.  ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विशेष उपक्रम हा या महान परंपरेचे स्मरण करून देणारा व भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा उपक्रम आहे.

००००

– प्रभाकर बारहाते,
प्र. जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली

 

 


Join WhatsApp