Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

एमएमआरडीए बनतेय मुंबईच्या विकासाचे ग्रोथ इंजिन – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Admin | 1 views
एमएमआरडीए बनतेय मुंबईच्या विकासाचे ग्रोथ इंजिन – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १६: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा यंदा प्रथमच शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून मुंबई आणि परिसराच्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी ४८ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. एमएमआर परिसर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी आणि भविष्यातील पाणी नियोजनासाठी विशेष भर देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत १६० वी वार्षिक सर्वसाधारण सभेची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल, विक्रमकुमार आदी उपस्थित होते.

नऊ वर्षांनंतर पहिल्यांदाच प्राधिकरणाने १७ लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला असून शिलकी अर्थसंकल्प सादर करणारी ही देशातील महत्वाची संस्था असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील ७५ टक्के खर्च हा रस्ते, मेट्रो, उड्डाणपुल, बोगदे, बाह्यमार्ग यासारख्या विकासकामांवर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एमएमआर क्षेत्रातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी युद्धपातळीवर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. प्रदेशातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ‘पोशीर’ आणि ‘शिलार’ या दोन्ही धरणांच्या कामांना तातडीने गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करण्यात आली आहे. एमएमआर क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ३३७ कि.मी. मेट्रो जाळ्यासोबत पॉड टॅक्सी, बोट टॅक्सी, मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी, फ्लायओव्हर, अंडरग्राउंड रस्ते आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांचा एकत्रित आराखडा राबवण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मेट्रो नेटवर्कसाठी १३ हजार ८३८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मेट्रो मार्ग ४, ६,५,२ ब आणि मार्ग १२ या प्रकल्पांना वेग द्यावा असे सांगितले. एमएमआर क्षेत्रातील सर्व प्रमुख मनपांचा मिळून नीती आयोगाच्या मदतीने एक ‘बृहद आराखडा’ तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी बीकेसीमध्ये पॉड टॅक्सी सेवा तर ठाणे व मीरा-भाईंदर येथे बोट टॅक्सीचा प्रयोग केला जाणार आहे. मेट्रो-बस-जलवाहतूक यांची एकत्रित जोडणी करून प्रवास अधिक जलद करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी डबल डेकर फ्लायओव्हर, अंडरग्राउंड टनेलिंग प्रकल्प, कोस्टल रोड आणि भिवंडी-नाशिक मार्गावरील पर्यायी रस्ते उभारले जात आहेत. ट्रॅफिक ब्लॅकस्पॉट ओळखण्यासाठी स्वतंत्र अभ्यासही करण्यात येणार आहे. मुंबईतील एलफिन्स्टन पुलाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे आणि घोडबंदर रोडवरील रस्ता रुंदीकरणाचे काम महिनाभरात पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले.

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले असून एमएमआरडीएच्या माध्यमातून रमाबाई आंबेडकर नगर येथील १७ हजार घरांच्या प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी एसआरएकडून नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. मुंबईत १७ प्रकल्पांची यादी तयार असून  ठाण्यात पाच इमारतींच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. रस्ते, मेट्रो, धरण यासोबतच एमएमारडीएच्या माध्यमातून चांगली घरे देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मेट्रो दुर्घटनेची गंभीर दखल

मुलुंडमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकल्पांचे सुरक्षा व स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ‘दक्षता पथके’ नेमून दररोज नियंत्रण आणि अधिकाऱ्यांनी क्षेत्र भेटी कराव्यात. हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

०००


Join WhatsApp