
१५० दिवसांचा कृति आराखडा आढावा
सिंधुदुर्गनगरी दिनांक 12 (जिमाका) :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात 100 दिवसांचा कृती आराखडा यशस्वीपणे राबविण्यात आला. आता राज्य शासनाने 150 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून प्रशासकीय सुधारणा करण्यावर भर दिला आहे. या अनुषंगाने सर्व विभागांनी आपल्या कार्यालयात ई-प्रशासनाच्या दृष्टीने सर्वंकष सुधारणा कराव्यात तसेच या अभियानामध्ये आपला जिल्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये येण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवत काम करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
पालकमंत्री नितेश राणे यांनी या अभियानाच्या अनुषंगाने शासकीय विभागांची आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राणे म्हणाले की, या अभियानांतर्गत सर्व विभागांनी तसेच क्षेत्रिय कार्यालयांनी ई-प्रशासनाच्या दृष्टिने सर्वंकष सुधारणा करुन कार्यालय नागरिकांना सोईचे कसे होईल यासाठी विशेष सुविधा पुरविणे अपेक्षित आहे. शासन आणि नागरिकांमधील संवाद वाढविणे आवश्यक आहे. या कार्यक्रमातून शासकीय यंत्रणेत आणखी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या अभियानात आपला जिल्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये आणण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेऊन काम करावे. निकषाला अनुसरुन जास्तीत जास्त गुण कसे मिळतील यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सादरीकरणाव्दारे या अभियानाची रुपरेषा, उद्दिष्ट्ये आणि जिल्ह्याची प्रगती सांगितली. या अभियानाच्या निकषानुसार संकेतस्थळ अद्ययावतीकरण, आपले सरकार अंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधा, ई-ऑफिस प्रणाली, डॅशबोर्ड, नाविन्यपुर्ण वेब ॲप्लिकेशनबाबतची सद्यस्थितीबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्यातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक पार पडली. गावोगावी जाणारे आंतरिक रस्ते, मुख्य मार्गावरील खड्डे तसेच पावसाळ्यामुळे खराब झालेल्या महामार्गांच्या स्थितीची माहिती बैठकीत मांडण्यात आली. तातडीने खड्डे बुजविणे, दुरुस्तीची गुणवत्ता सुनिश्चित करणे आणि ठेकेदारांची जबाबदारी ठरविणे या बाबींवर द्यावा असेही पालकमंत्री म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बागुल, सावंतवाडी विभागाच्या कार्यकारी अभियंता पुजा इंगवले, राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण तसेच जिल्हा परीषद बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000
