Pune | Thu, 16 April 2026

No Ad Available

चंद्रपूरचा प्रदुषण मुक्तीचा प्लान तयार करणार- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

Admin | 8 views
चंद्रपूरचा प्रदुषण मुक्तीचा प्लान तयार करणार- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

चंद्रपूर, दि. १६ : चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. उद्योगांच्या विरोधात आम्ही नाही. मात्र उद्योगांनी सुद्धा नियमाप्रमाणे चालावे. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही. येथील उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे, याची जाणीव आपल्याला आहे. त्यामुळेच आज चंद्रपूर येथे येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. प्रदुषणमुक्ती संदर्भात सुरवातीला चंद्रपूरचा एक वर्षाचा, नंतर तीन वर्षाचा आणि दीर्घकालीन प्लान तयार करण्यात येईल, अशी ग्वाही पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

दुर्गापूर येथील चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राच्या कन्व्हेअर बेल्ट, बेलसणी येथील महामाया कोल वॉशरीज आणि घुग्घुस येथील विदर्भ मिनरल एनर्जी या कंपनीला भेट देऊन श्रीमती मुंडे यांनी प्रदूषणाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जनतेसोबत संवाद साधताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवार जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे अधिकारी श्री. यादव आदी उपस्थित होते.

सुधीरभाऊंनी विधानसभेत प्रदूषणाबाबत प्रश्न उपस्थित केला, त्याच वेळेस मी त्यांना आश्वासित केले होते की, या प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी मी प्रत्यक्ष चंद्रपूर येथे येऊन प्रदूषणाची समस्या जाणून घेईल. चंद्रपूर येथे मोठ्या प्रमाणात उद्योग असल्यामुळे येथील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील नागरिकांचे दुःख पाहण्यासाठी आज मी प्रत्यक्ष येथे आली आहे.

प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. जीव अतिशय महत्वाचा असून लोकांच्या जीवाशी कोणालाही खेळू देणार नाही. उद्योगांनी प्रदुषण कमी करणारे फॉगर, फॉगिंग मशीन व इतर साधनसामुग्री त्वरीत बसवावी व नियमाप्रमाणे चालावे. अन्यथा पर्यावरण मंत्री म्हणून त्यांच्यावर अंकुश कसा ठेवायचा हे आपल्याला माहित आहे. जे अधिकारी ऐकणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. कंपन्यांच्या प्रदुषणामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा कापूस काळा पडत असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची त्यांना भरपाई देण्यात येईल.

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे येथे आल्या आहेत. प्रदूषणाच्या संदर्भात कायद्याच्या व नियमाच्या चौकटीत निर्णय घेण्यात येईल. तसेच पर्यावरण संदर्भात एक जिल्हास्तरीय समिती तयार करण्यात येईल. प्रदूषणामुळे येथील नागरिकांना विविध प्रकारचे आजार झाले असून शेतकऱ्यांचा कापूस पूर्णपणे काळा पडत आहे. त्यांना कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

००००००


Join WhatsApp