
पुणे, दि.१४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र केवळ घोषणांपुरता मर्यादित न ठेवता, तो प्रत्यक्ष सामाजिक प्रगतीसाठी अंमलात आणणे आवश्यक आहे. आजच्या काळात केवळ स्मारके किंवा फ्लेक्स लावण्यापेक्षा समाजातील तरुण पिढीला, विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि उद्योगासाठी प्रत्यक्ष मदत करणे हीच महामानवाला खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी येथे प्रादेशिक उपआयुक्त, समाज कल्याण, पुणे विभाग, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आणि सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कार्यक्रम तसेच सामाजिक समता सप्ताहाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, समाज कल्याण आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, विभागाचे सहआयुक्त (शिक्षण) प्रमोद जाधव, प्रादेशिक उपआयुक्त वंदना कोचुरे, सहायक आयुक्त विशाल लोंढे आदी उपस्थित होते.



