
मुंबई, दि. २४ : भारतीय साहित्य विश्वात आपल्या लेखनशैलीने अनोखा ठसा उमटवणारे ज्येष्ठ साहित्यिक, तत्वचिंतक व प्रख्यात कादंबरीकार पद्मभूषण एस. एल. भैरप्पा यांच्या निधनाने साहित्य आणि तत्वचिंतनाच्या क्षेत्रात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भैरप्पा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री पवार म्हणतात, “एस. एल. भैरप्पा यांनी आपल्या वैविध्यपूर्ण व मर्मभेदी कादंबऱ्यांमधून भारतीय संस्कृती व समाजजीवनाचा वास्तवदर्शी वेध घेतला. त्यांच्या कन्नड कादंबऱ्यांना देशभरातील वाचकांनी उचलून धरले. विविध विषयावरील कादंबऱ्या, निबंध, समीक्षाग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय साहित्य विश्वाला समृद्ध केले. त्यांचे लेखन भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. शिक्षण क्षेत्रासाठीही त्यांचे योगदान मोलाचे आहे. भैरप्पा यांचा परखड दृष्टिकोन आणि टोकदार साहित्यिक शैली हीच त्यांची विशेष ओळख होती. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो,” या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भैरप्पा यांना श्रद्धांजली अर्पण केली.
0000
