Pune | Mon, 16 February 2026

No Ad Available

बालकलाकारांच्या कल्पकता आणि रंगांमधून दिसले भारताच्या उज्ज्वल भविष्याचे चित्र – मंत्री जयकुमार रावल

Admin | 9 views
बालकलाकारांच्या कल्पकता आणि रंगांमधून दिसले भारताच्या उज्ज्वल भविष्याचे चित्र – मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. १५ :- ‘सेवापर्व’ या उपक्रमाअंतर्गत प्रदर्शनातील बाल कलाकारांच्या सर्जनशीलतेने उपस्थितांना प्रभावित केले आहे. कल्पकतेतून आणि रंगांमधून त्यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्याचे चित्र रंगवलेले दिसले असून यातून त्यांनी दिलेला देशाच्या प्रगतीचा उत्साहवर्धक संदेश प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

‘विकसित भारत २०४७’ या विषयावर चित्रकला कार्यशाळा व स्पर्धेचे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एन.जी.एम.ए.) च्या वतीने आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत झाला यावेळी ते बोलत होते. एनजीएमएच्या संचालक निधी चौधरी तसेच किशोर झुनझुनवाला, यासह विविध मान्यवर, अध्यापक, व्यावसायिक कलाकार, महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री जयकुमार रावल म्हणाले,या कार्यक्रमाने कलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची गती वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित ‘सेवेला सर्जनशीलतेचा संदेश’ दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन देशातील प्रत्येक नागरिकाने सेवा, नवोन्मेष आणि राष्ट्रनिर्माणाच्या भावनेने कार्य केले, तर भारत पुन्हा ‘विश्वगुरू’ म्हणून उभा राहील असेही मंत्री रावल म्हणाले.

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संचालक निधी चौधरी यांनी प्रास्ताविकात एनजीएमएच्या उपक्रमांद्वारे समाज आणि राष्ट्रविकासात कलेच्या भूमिकेबाबत माहिती दिली.

‘सेवा पर्व २०२५’ हा भारत सरकारचा देशव्यापी सांस्कृतिक उपक्रम १७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात आला. ‘सेवा पर्व २०२५ – विकसित भारत के रंग, कला के संग’ या विषयावर ३० सप्टेंबर २०२५ रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमात मुंबईतील विविध शाळांमधील २००० हून अधिक बालकलाकारांनी सहभाग घेतला होता.

या प्रसंगी व्यावसायिक कलाकार, महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी तसेच प्रोत्साहनपर पारितोषिक विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांतील प्रथम क्रमांक पुरस्कार १०,०००/- रुपये विजेत्या प्रियंका गोविंद चव्हाण एम.पी.एस. कुलाबा स्कूल, द्वितीय रुकैया रियाज शेख एम.पी.एस. उर्दू स्कूल ताडदेव , तृतीय एम.पी.एस. इंग्लिश स्कूल कुलाबा, शिफा नसिरुद्दीन खान, यासह उत्तेजनार्थ पुरस्कार सृष्टी तुकाराम डिंगळे, अजमत हुसेन मुर्शिद शेख गिल्डरलेन, आशा मनोहर जाधव यांना देण्यात आले.

महाविद्यालयीन विद्यार्थी गटात 25,000/- रुपये प्रथम पारितोषिक शुभम राऊत, द्वितीय सौम्या रंजन मोहराना तृतीय सिया बाफना, चतुर्थ पुरस्कार मनीष चंद्रशेखर पाटोदे यांना देण्यात आला. तसेच कलाकारांसाठी स्पर्धेतील विजेत्याला 50,000/- रुपये प्रथम पारितोषिक राजेंद्र कुंभार, द्वितीय हर्षद एम. गोंडल, तृतीय अमोल मनोहर पवार आणि चतुर्थ पुरस्कार पुरेंद्रकुमार देवगीरकर यांना देण्यात आला. त्याचबरोबर ‘हिंदी पखवाडा पारितोषिक वितरण’ देखील करण्यात आले. एनजीएमए यांच्या या उपक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिका व सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट यांचा सहभाग होता.

00000

किरण वाघ/विसंअ

 


Join WhatsApp