Pune | Sat, 14 February 2026

No Ad Available

अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुंबई भेटीदरम्यान चोख व्यवस्था ठेवावी – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

Admin | 3 views
अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुंबई भेटीदरम्यान चोख व्यवस्था ठेवावी – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. ११ : भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करीत आहे. भारताच्या या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा मोलाचा वाटा असून विविध देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपती मुंबई भेटीसाठी येतात. त्यांच्या या भेटीप्रसंगी कोणतीही कमतरता राहणार नाही याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

फ्रान्सचे राष्ट्रपती १६ फेब्रुवारीपासून मुंबई दौऱ्यावर येत आहेत. याचदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे देखील मुंबई येथे नियोजित कार्यक्रम आहेत. या दोन्ही अतिमहत्त्वाच्या नेत्यांच्या दौऱ्याच्या तयारीचा राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. विभागाचे सचिव राजेश गवांदे यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले, फ्रान्सचे राष्ट्रपती शिष्टमंडळासह थेट मुंबईत येत आहेत,  ही महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण बाब आहे. या भेटीदरम्यान सुरक्षा आणि राजशिष्टाचारामध्ये कोणतीही कमतरता राहू नये. व्हिसा, इमिग्रेशन, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता, वाहनांची सुस्थिती आदी बाबींचा आढावा घेऊन सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले. सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे असे आवाहन करुन राजशिष्टाचार विभागाच्या सचिवांनी याचे समन्वयन करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ


Join WhatsApp