
मुंबई, दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत ते ‘शाश्वत पर्यावरण विकास परिषद’ या महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर संवाद साधणार आहेत.
ही मुलाखत मंगळवार, दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार असून, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरदेखील उपलब्ध होईल. ही मुलाखत निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी घेतली आहे.
X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
दरवर्षी 18 सप्टेंबर रोजी ‘जागतिक बांबू दिन’ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने वाढत्या जागतिक तापमानवाढीवर तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले असून, या दिशेने भारतासह महाराष्ट्रानेही पुढाकार घेतला आहे. वातावरणीय बदलाच्या आव्हानावर मात करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण धोरणात्मक पावले उचलली आहेत. याच अनुषंगाने ‘हरित महाराष्ट्र’ घडविण्याच्या संकल्पांतर्गत लाखो हेक्टरवर बांबू लागवड सुरू आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, उद्योगांना मुबलक कच्च्या मालाचा पुरवठा तसेच पर्यावरणाला शाश्वत दिशा मिळणार आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून 18 सप्टेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे ‘बांबू परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसंदर्भात तसेच शासनाच्या विविध उपक्रमांविषयी अध्यक्ष पाशा पटेल यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमामध्ये सविस्तर माहिती दिली आहे.
०००
