
मुंबई, दि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये ‘सांस्कृतिक कार्य विभागाचे कामकाज तसेच राज्यातील गडकिल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय’ या विषयावर सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जतन करून त्याचे संवर्धन करणे आणि किल्ल्यांचे मूळ वैभव अबाधित ठेवणे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध स्तरांवर नियोजनबद्ध आणि प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. राज्यातील ऐतिहासिक वारसा, गडकिल्ले, स्मारके आणि सांस्कृतिक परंपरा यांचे संरक्षण व जतन करण्यासाठी धोरणात्मक नियोजन, निधी उपलब्ध करून देणे तसेच विविध शासकीय आणि तज्ज्ञ संस्थांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य विभागामार्फत केले जात आहे.

तसेच राज्याच्या सांस्कृतिक ओळखीचे जतन आणि संवर्धन व्हावे, यासाठी जनजागृती उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच वारसा पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबतची सविस्तर माहिती सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी या मुलाखतीत दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातील ही विशेष मुलाखत मंगळवार, 17 आणि बुधवार, 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार असून ती ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. तसेच ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमामध्ये ही मुलाखत मंगळवार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. याशिवाय ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी केले आहे.
अधिकृत समाजमाध्यम दुवे :
X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
0000
जयश्री कोल्हे/स.सं.
