
मुंबई, दि. २८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या ‘मानसिक आरोग्य आणि ताणतणाव व्यवस्थापन’ या विषयावर रा. आ. पोदार आयुर्वेद मेडिकल कॉलेज वरळी, मुंबई येथील शल्यतंत्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक, डॉ. प्रज्ञा कापसे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत १ ते ५ डिसेंबर २०२५ या कालावधीत दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News on AIR’ या मोबाईल अॅपवर प्रसारित होईल. ही मुलाखत निवेदिका उन्नती जगदाळे यांनी घेतली आहे.
आजच्या धावपळीच्या जगात, ताणतणाव हा अनेक लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक अपरिहार्य भाग बनला आहे. या पार्श्वभूमीवर तणाव ओळखून त्याचा योग्य पद्धतीने सामना करणे ही आजची अत्यावश्यक गरज ठरली आहे. दैनंदिन जीवनातील ताण कमी करण्यासाठी वेळेचे नियोजन, नियमित व्यायाम, ध्यान-श्वसनक्रिया, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि आवश्यकतेनुसार समुपदेशनाचा सल्ला घेणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने राज्य शासन मानसिक आरोग्याशी संबंधित सेवांचा विस्तार करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून शाळा, महाविद्यालये तसेच कामकाजाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य जनजागृतीच्या उपक्रमांना प्रोत्साहन देत आहे. नागरिकांनी आपले ‘मानसिक आरोग्य आणि ताणतणाव व्यवस्थापन’ कसे करावे, आहार कसा असावा आणि काय काळजी घ्यावी याबाबत सहाय्यक प्राध्यापक, डॉ. कापसे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
०००
